प्रिय रिक्षावाले काका,

नवल आहे की नाव लक्षात नाही. फोन मध्ये सुद्धा ‘जाधव रिक्षावाले काका’असं नाव सेव केलंय. घरा खाली येऊन भाँ..भाँ..भाँ ss. असा हॉर्न वाजला की “रिक्षावाले काका आले.रे!!! असं ऐकू यायचं म्हणून सवय झाली असावी. इयत्ता सातवी ते दहावी मी तुमच्या रिक्षेत होतो पण दहावी झाल्यानंतर शाळा संपली आणि रिक्षाही. आम्हाला जेवढं शाळा शिकवते तेवढच रिक्षा सुद्धा शिकवते असं मला वाटतं. आता स्वतःची गाडी आली, पण रिक्षेत गर्दी होती म्हणून पुढे मागे बसण्याची मजा गाडीत नाही. एक मुलगा सुद्धा जास्त झाला तरी “एss पोरा तू पुढे बस!! बाजूला सरक, तू मागे हो!! जा मागे ss!!! असं करून बरोबर बसवायचं. एवढे अँगलमध्ये वळल्यावर याला इथे जागा मिळेल हे व्यावहारिक गणित शाळेच्या शिक्षकांपेक्षा तुम्हाला अधिक येत होतं.

असा म्हणतात की आई,वडील आणि गुरु हे तीन अत्यंत महत्वाचे. मी म्हणीन आई, वडील, गुरु आणि महत्वाचे रिक्षावाले काका हे हवेच . तुमच्या शालेय जीवनात तुम्ही कितीही बक्षिस जिंका पण ते दाखवायला हा रिक्षा-परीवार नसेल तर तुम्ही शून्य आहात. आई, वडील, गुरु जशी आमची काळजी घेतात तशीच तुम्हीसुद्धा घेतली. दुसऱ्या रिक्षेतल्या पोरांशी भांडण झाली की पहिले तुम्ही पुढे ” माझ्या पोरांना हात लावायचा नाही ” म्हणून कधी आईच्या भुमिकेत, कधी बापाच्या ( शाळेच्या प्रगतीपुस्तकावर सहीसाठी नाही ). कधी “हा, स्टार्ट कर बरं रिक्षा !! नायना त्याला XXX मध्ये जोर लागतो हे बघ…. ” असं म्हणू न गुरूची भुमिका, तर रिक्षात आमचे गाणी-पोवाडे एकाटण प्रेक्षकाची भूमिका. सगळ्या सगळ्या भूमिका तुम्ही पार पाडल्यात. आणि म्हणूनच शाळेतील शिक्षणची सुरुवात रिक्षातील शिक्षणाने होते हेच खरे. .

अनेक नवनवीन गाणी, छोटया छोटया कला, हस्तकला शिकण्याची रिक्षा ही उत्तम जागा होती. अनेक गोष्टी पहिल्यांदा रिक्षातच शिकायला मिळतात (सिनेमाच्या गाण्यांसकट). शाळेत एखादे बक्षीस मिळवल्यानंतर सर्वप्रथम धावत येऊन तुम्हाला सांगण्यातला तो आनंद आणि त्यानंतर तुम्ही दिलेली कोतुकाची थाप, ही आई-वडिलांच्या कौतुका एवढीच मोलाची वाटायची . अणि परिक्षेच्या शेवटच्या दिवशी केलेल्या पार्टिचा आनंद जास्त असायचा. खूssप धमाल !!! आज तो आनंद / मजा कितीही मित्र एकत्र जमले तरिही येत नाही. आता असं काळजी घेणारं कोणी नाही. कॉलेज च्या शेवटच्या दिवशी पार्टी देणारं कोणी नाही.

हे सगळं मी लिहीलं खरयं पण वाचायला तुमच्या कडे मोबाईल कोणता आहे माहित नाही. वन रूम किचन मधे सुदूधा इतक्या आनंदाने राहणारे व्यक्ति कमीच. मला आठवत मी आणि दिनेश ( दिन्याss, बाही तोंडात घालून फिरायचा तो !!!) एकदा तूमच्या घरी आलो होतो तर आमच्या साठी बाहेरून केक आणला होता आणि घरातली सकाळची बटाटयाची पोळी-भाजी होती. पण त्या केक पेक्षा ती पोळी-भाजी जास्त गोड लागली. अजून सुदूधा ती चव लक्षात आहे , बाकिच्या मूलांना हे ‘भाग्य’ मिळाले नाही हे त्या वेळेस काय अजून सुद्धा वाटतं (नंतर आम्ही त्यांना चिडवलं !!! )

असो , ‘प्रपंच करूनी परमार्थ साधावा ‘ या ओळी अगदी सार्थ आहेत तूमच्या साठी . जेवढं बोलावं तेवढं कमीच. भेटूनच बोलीन आता.

काळजी घ्या, नमस्कार

Amogh Vaidya

Amogh Vaidya is a Writer from Pune. He has completed his graduation from Fergusson College and completed his Master’s degree in Sanskrit from Deccan College Pune. He has won awards for writing excellent One Act Plays for different Inter-Collegiate Competitions.